लोक न्यूज
अमळनेर : तालुक्यात  गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन  मुली , तरुणी ,विवाहिता पळून जाण्याच्या घटना , प्रेमविवाह करण्याच्या घटना वाढून सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. यातून दोन कुटुंब ,समाज यामध्ये तणाव वाढत असल्याने मराठा महिला मंडळाने महिला सक्षमीकरण , तरुणींना मार्गदर्शन आणि जनजागृतीचा  उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक भागात कॉर्नर मिटिंग घेऊन मार्गदर्शन केले जात आहे.
  सर्वत्र  तरुण मुलींनी स्वतःच्या इच्छेने परस्पर विवाह केल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. यामुळे पालकांमध्ये संभ्रम व चिंता निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये सजगता निर्माण करण्यासाठी मराठा महिला मंडळ, अमळनेर यांच्या वतीने विशेष चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.

  या उपक्रमांतर्गत शहरातील विविध वसाहतींमध्ये ‘कॉर्नर मिटिंग्स’ घेतल्या जात असून, आतापर्यंत दोन बैठका पार पडल्या आहेत. या चर्चासत्रांमध्ये  महिलांना विवेकी, सुरक्षित आणि स्वयंपूर्ण निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
मराठा मंडळाच्या अध्यक्षा प्रा. शीला पाटील यांनी  समाजातील बदलती परिस्थिती, मुलींच्या निर्णयामागची मानसिकता व त्यांच्या भावनिक गरजांचे भान ठेवून योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख मार्गदर्शक डॉ. भारती पाटील या देखील यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करीत आहेत. यात प्रामुख्याने  संवादाचा अभाव दूर करणे , पालकांनी मुलींशी मोकळा संवाद साधणे त्यांच्या भावना, अपेक्षा आणि अडचणी समजून घेणे, विश्वास निर्माण करणे,  निर्णय प्रक्रियेत मुलींच्या मतांचा आदर करून त्यांना मानसिक आधार द्यावा. लैंगिक शिक्षण व जागरूकता ,शारीरिक-भावनिक बदल, प्रेमसंबंध व ऑनलाइन सुरक्षिततेसंदर्भात योग्य माहिती दिली जावी.  सोशल मीडियावरील फसवणूक, ब्लॅकमेलिंगपासून सावध राहण्यासाठी मुलींना मार्गदर्शन करणे त्यांना  भावनिक आधार  देणे ,तणाव, नैराश्याच्या काळात तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी मुलींना प्रोत्साहित करावे. पालकांचे सकारात्मक वर्तन , बंधने लादण्याऐवजी संवाद, समजूत आणि सहकार्याची भूमिका घ्यावी.करिअर व स्वप्नांना प्रोत्साहन करणे, मुलींच्या शिक्षण व करिअरला पाठिंबा देऊन त्यांना स्वावलंबी बनवावे या मुद्द्यांवर चर्चा केली जाते.
 
चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा शीला पाटील, सीमा सूर्यवंशी , पद्मजा पाटील, तिलोत्तमा पाटील, अलका पाटील, वसुंधरा लांडगे, कांचन शहा, कृपाली पाटील,पूजा पाटील, डॉ. भारती गाला, अनिता बोरसे, भावना देसले आणि रेखा शिंदे परिश्रम घेत आहेत.