अमळनेर-महावितरणच्या जळगाव परिमंडळाअंतर्गत पारोळा तालुक्यातील शेळावे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते थाटात संपन्न झाला.
या कार्यक्रमास मा. इब्राहीम ए. मुलाणी (मुख्य अभियंता, जळगाव परिमंडळ, महावितरण) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.याशिवाय असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.३३६.७६ लक्ष रुपयांच्या खर्चातून उभारलेले आधुनिक उपकेंद्र आ.अनिल पाटील यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आले असून या उपकेंद्रामुळे परिसरातील वीजवाटप व्यवस्था अधिक सक्षम, विश्वासार्ह व कार्यक्षम झाली आहे.याशिवाय शेळावे व परिसरातील गावांसाठी हे उपकेंद्र एक महत्त्वाचा वीजपुरवठा केंद्रबिंदू ठरणार आहे.नियमित वीजपुरवठ्यासाठी भक्कम पायाभूत सुविधा याठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
या नव्या उपकेंद्रामुळे खालीलप्रमाणे होणार थेट लाभ -
सद्यस्थितीतील भारवाढ नियंत्रणात येणार,दबावातील चढ-उताराचे प्रमाण कमी होणार,वीजपुरवठ्यातील खंडिततेत लक्षणीय घट होणार
,औद्योगिक, कृषी व घरेलू ग्राहकांना अधिक विश्वासार्ह व स्थिर वीज मिळणार.
आमदारांनी केली उपकेंद्राची पाहणी
सदर उद्घाटन प्रसंगी आमदार अनिल पाटील यांनी संपूर्ण उपकेंद्राची स्वतः पाहणी करून संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यांनी मुख्य अभियंता व इतर तांत्रिक अधिकाऱ्यांकडून उपकेंद्राची कार्यपद्धती, क्षमता, तांत्रिक वैशिष्ट्ये, वीजवाटप व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती घेतली.
दरम्यान मनोगत व्यक्त करताना आमदार पाटील यांनी या उपकेंद्रामार्फत परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम, सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी महावितरणच्या अभियंत्यांनी वेळेवर व दर्जेदार काम पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले व अशाच प्रकारची कार्यशैली भविष्यातही टिकवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.आमदारांनी व्यक्त केलेल्या भावना व विचारांनी कार्यक्रमाला अधिक प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले. उपकेंद्राच्या उद्घाटनाने केवळ वीजप्रवाह सुरू झाला नसून, एक विकासप्रवाहाला दिशा मिळाली आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या उपकेंद्राच्या उद्घाटनानंतर शेळावे व परिसरातील ग्रामस्थ मंडळींनी समाधान व्यक्त केले. अनेक वर्षांपासून वीजपुरवठ्यात सातत्याने येणाऱ्या अडचणी व भारवाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांना आता कायमस्वरूपी दिलासा मिळणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. महावितरणच्या वतीने या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासन, अभियंता व तांत्रिक कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.