लोक न्यूज
अमळनेर-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमळनेर आगारातील दहा कर्मचारी एकाचवेळी निवृत्त झाल्याने माजी मंत्री तथा आ.अनिल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.
एस टी महामंडळ राज्यातील सामान्य जनतेसाठी जीवनवाहिनीच ठरले आहे. या महामंडळाच्या यशस्वी कार्यप्रणालीमागे अनेक निष्ठावान, कष्टाळू आणि जबाबदार कर्मचारीवर्गाने केलेले सातत्यपूर्ण योगदान आहे. अशाच काही कर्मवीरांचा सेवानिवृत्ती समारंभ नुकताच आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत अत्यंत स्नेहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला.यावेळी माजी नगराध्यक्ष सौ जयश्री अनिल पाटील,आगार व्यवस्थापक श्री चौधरी व इतर अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी एल.टी. पाटील, ज्यांनी वाहतूक नियंत्रण अधिकारी या अत्यंत जबाबदारीच्या पदावरून सेवा बजावली, त्यांच्यासह इतर दहा कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या योगदानास कृतज्ञतेने वंदन करत, त्यांचा सन्मान करण्यात आला.
यात रवींद्र सुरसिंग पाटील (चालक),अनिल शिवाजी पाटील( लिपिक),अनिल निंबा सोनार(सहाय्यक कारागीर), गडबड भालचंद्र बिऱ्हाडे (चालक), प्रकाश फत्तू शिरसाठ ( चालक),न्हानभाऊ नाटू पाटील (चालक),
गणेश सुपडू पाटील(चालक),
रणजीत गोकुळ पाटील (वाहक),राजेंद्र अमृत बडगुजर (वाहक) आदींचा सत्कार करण्यात आला.
या सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा कालावधीत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि कर्तव्यपरायणतेने आपले काम पार पाडले. कोणत्याही हवामानात, कोणतीही अडचण न मानता, त्यांनी प्रवाशांना वेळेवर सेवा मिळावी यासाठी आपल्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडल्या. त्यांच्या डोळ्यांत असलेली कर्तव्यनिष्ठा आणि मनात असलेली सेवा भावना हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
सहकाऱ्यांना निरोप देताना उपस्थित कर्मचाऱ्यांचेही मन भरून आले होते.सर्वानी त्यांना सन्मानित केले.सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन त्यांच्या दीर्घ सेवा आणि कार्यातील मोलाच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक गौरव व्यक्त केला.