लोक न्यूज
अमळनेर नगर परिषदेकडून मासिक सर्वसाधारण सभा होत नसल्याचा आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
अमळनेर : शहरातील विविध समस्या, तक्रारी तसेच विकासकामांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी नगर परिषदेची दर महिन्याची सर्वसाधारण सभा घेणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक असतानाही सत्ताधाऱ्यांकडून या सभांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक श्री विजय पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एप्रिल महिन्यात महात्मा जोतिबा फुले जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच अमळनेरची प्रसिद्ध अक्षयतृतीया आणि संत सखाराम महाराज यात्रा उत्सव यांसारखे महत्त्वाचे कार्यक्रम होणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील नियोजन, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था आदी विषयांवर सविस्तर चर्चा होणे अत्यावश्यक आहे. मात्र नगर परिषदेकडून नियमित सभा न घेतल्याने नियोजनाचा अभाव निर्माण होत असून नागरिकांमध्ये नाराजी पसरत आहे.
नगरसेवक विजय पाटील यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, “नगर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु सत्ताधारी दर महिन्याची सभा टाळून नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे शहरातील विकासकामे रखडली असून तक्रारींचा ढिग वाढत आहे.”
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून नगर परिषदेला नियमांनुसार मासिक सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश द्यावेत, तसेच संबंधित जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे अमळनेर शहरातील प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.